साहित्य - १ वाटी तांदूळ, १ वाटी गूळ, १ वाटी नारळाचा किस, तीन चमचे साजूक तूप, दोन लवंगा, दोन चिमूट वेलदोड्याची पूड, १० काजू.
वेळ -३५ मिनिटे ,
किती जणांसाठी? - ४ ते ५ माणसांसाठी
कृती -
१) तांदूळ धुवून घ्यावेत, १ वाटी तांदळासाठी ( कोलम) १वाटी पाणी घालावे. कुकरमधे दुसर्या डब्यात नारळाचा किस ठेवावा. भात शिजवून घ्यावा.
२) भात ताटात/ परातीत काढून पसरवावा. त्यावर एक चमचा तूप घालावे.
३) कढईत दोन चमचे तूप घालावे. तूप कडकडीत झाल्यावर त्यात दोन लवंगा टाकाव्यात, नंतर भात घालावा. भात नीट हलवला की लगेच नारळाचा किस घालून हलवावे. नंतर गूळ मिसळावा.
४) भाताला दोन वाफा आणाव्यात.
५) वरून वेलदोड्याची पूड आणि काजूचे तुकडे घालावेत व गरम गरम ’गूळभात’ वाढावा.
तुम्ही कधी तिरूपतीला गेला आहात का? तिथे प्रसादाचा जो गूळभात मिळतो... अप्रतिम! तिथे भाविक देवाला वेगवेगळी घंगाळं बोलतात. जर कोणी गूळभाताचा प्रसाद दाखवला असेल तर ...घंघाळभर गूळभाताचा व्यंकटेशाला नैवेद्य दाखवतात. नेमके आपण तेव्हाच दर्शन घेऊन बाहेर पडत असू तर.... द्रोणात गूळभात मिळतो. असा गूळभात खाल्यावर पुन्हा देवदर्शनाच्या रांगेत उभं राहायचा मोह मला झाला होता.
समजा तुमच्यावेळी नसेल गूळभात तर निराश होऊ नका. दहीभात असेल किंवा तीळभात असेल, चित्रान्न असेल......... वा! .....जो प्रसाद असेल तो ! तुम्ही चाटून पुसून खाल याची खात्रीच!